Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Tuesday, June 20, 2006

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया

मागच्या आठवद्यात पुन्हा एकदा ट्रेन ला उशीर झाला होता. सकाळची लवकरची एक मिटीन्ग होती म्हणुन स्टेशनवर सकाळी लवकर (पावसात तड्फडत) पोचले तर हीSSS गर्दि… नुस्त्या छत्रया आणि निथळणा-या माणसांचा उसळलेला समुद्र ! तशी रोजच गर्दी असते- पण गाडीही उशीरा येणार आणि येवढेच नाही तर तोक्योच्या दिशेने जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक बोंबलले आहे हे कळल्यावर वैताग/चिडचिड व्ह्यायच्या ऐवजी, आधी काळजात धस्स झाले. ! माझे भय कधि खोटे बोलत नाही.
लवकरच त्या सगळ्या गोंधळातुन अपेक्षित घोषणा कानावर पडली आणि खात्री पटली.
जे बर-याचदा होते इथे, तेच झाले होते ! कोणीतरी सकाळी ७:०६ वाजता गाडीसमोर उडी मारुन आत्महत्या केली होती आणि तोक्यो कडे जाणा-या सर्व गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. ह्याला जपानीत "जिनशिनजिकौ " म्हणतात ! (जपानित literal शब्दार्थ- human-body-accident)

हे -आताशा फार व्हायला लागले आहे का ? सरासरी आठवड्यातून १दा हा प्रकार होऊ लागला आहे…… इतके कसले ह्र्दयद्रावक प्रसंग घडले असतील या अभागी माणसांच्या आयुष्यात, की त्यांनी हा मरणाचा अतिशय भीषण आणि वेदनादायक प्रकार स्वीकारावा ? “स्वेच्छामरणाला” सुद्धा माझा खरंतर तात्विक विरोध नाही, पण ह्या अशा हिंसात्मक मरणाचं ऐकुन माझ्या तरी जिवाचा नुसता थरकाप होतो. जीवनात शांतता नाही, म्हणुन मरण पत्करावे, तर मरण देखील शांतपणे येऊ नये ही कसली दैवगति ? हा कुठला ऊफराटा न्याय? एक वेळ असे जरि मान्य केले, की जिवनसंघर्षाला कंटाळुन , एखाद्यानी हा आततायी निर्णय घेतला असेल- तरी मरणाची ही कसली त-हा? मरणच मागायचे तर शांत , मुक्त करणारे का नाही? मग ह्या नरकयातना देणा-च्या, देह छिन्नविछीन्नं करणा-या मरणाची मनिषा या लोकांनी का करावी?

जिने की वजह तो कोई नही, मरने का बहाना ढुंढता है !
मरने का ऐसा कौनसा जायज बहाना मिल गया ? हा प्रश्न मला नेहमी पडतो.

जपान मध्ये असा गाड्यांना उशीर झाला की स्टेशनवर (साहेबाला दाखवण्यासाठी ) एक चिठ्टी देतात ज्यावर लिहीले असते की आज गाडीला उशीर झाला वगैरे आणि जपानी कंपन्यात काम करणारे लोकं ती चिठ्ठी आवर्जुन घेतात. जे प्रवासी पैसे परत मागतील, त्यांना जपान रेल्वे तिकिटाच्या काही टक्के , ठराविक रक्कम परत करते. आणि असे ऐकले आहे की अशी आत्महत्या करणा-या म्रृत व्यक्तिच्या कुटुंबालाच जपान रेल्वेला नुकसान भरपाई द्यावी लागते. हे खरे असेल- तर मला अजुनच अचंबा वाटतो. आपल्याच कुटुंबियांना अजुनच त्रास (मानसिक आणि आर्थिक) होणार, हे निश्चित असताना ही हे असे का करत असावेत ?

माझा साहेब फिरंगी आहे, तो पुर्वाश्रमी बरीच वर्ष राणीच्या देशात पोलीस खात्यात होता, आणि त्याची बायको जपानी आहे. हे एवढ्याच साठी सांगीतले की त्याला गुन्हेगाराच्या मानसिकतेची जाण आहे आणि बायको जपानी असल्याकारणाने त्याचे जपानी लोकांबद्दलचे अनुभव जास्ती आहेत, जपानी संस्कृतीशी त्याचा घनिष्ठ परिचय आहे. तर त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण असे आहे की - “”These people have not been able to create an impact in their life, at least in death, they get noticed, and are able to create an impact (even if negative), and affect so many people. “”

ही सगळी मानसिकता वगैरे खरी असली तरी, बेरोजगारी, अठरा विश्वे दारिद्र्य, स्वेच्छेने स्वीकारलेला भयंकर अगदि चिरुन टाकणारा एकटेपणा, कामाचा डोंगर, तीव्र महागाई ( तोक्यो हे जगातील सर्वात महाग शहर आहे), भावनिक आधारसंस्थांचा अभाव आणि एकंदरीतच, भावनांचा सह्जासहजी निचरा न करु देणारी संस्कृती- ही प्रमुख कारणे आहेत. २००५ मध्ये आत्महत्या करणा-यांपैकी ७२% पुरुष होते आणि जवळजवळ अर्धे बेरोजगार!

माझ्या एका सहकार्याने तर अशा एका माणसाला प्रत्यक्ष पाहिले. तो गाडीची वाट पहात स्टेशनवर थांबला होता. गाडी जवळ आली तशी क्षणार्धात त्याच्या पासुन १० फ़ुटावर असणा-या एका माणसाने , काही कळायच्या आत गाडीसमोर उडी घेतली !
मला तर नेहमी प्रश्न पडतो की ज्या गाडीसमोर अशी घटना घडत असेल त्या बिच्चा-या चालकांना काय वाटत असेल? (रेल्वे प्रशासनाच्या पदरी अशी नोकरदार माणसे आहेत की जे ह्या छिन्नविछीन्न झालेल्या देहाची योग्य विल्हेवाट लावण्यात तरबेज असतात! )
आणि सर्वात वाईट वाटते ते अशा लोकांच्या कुटुंबियांसाठी , जाणारा तर आपल्या कर्मानी गेला, पण उरलेल्यांनी कशाच्या बळावर हा आयुष्याचा प्रपंच चालु ठेवायचा?

पु.ल.देशपांड्यांच्या पुर्वरंग मध्येही “हाराकीरी” चा उल्लेख आहे. अतामी चा टॅक्सी एक चालक, त्यांना एक कडा दाखवून सांगतो, की पुर्वी इथून खूप लोकं आत्महत्या करायचे. जपानात एकंदरीतच आत्महत्येचे प्रमाण फार! असे म्हणतात की २००५ साली जितके लोकं रस्त्यावरच्या अपघातात गेले, त्याहून जास्त लोकांनी आत्महत्या केली.

गेली आठ वर्ष सातत्याने ३०,००० हुन जास्ती लोकं दरवर्षी आत्महत्या करतात. प्रगत औद्योगिक राष्ट्रांमधील माणशी सर्वाधिक आत्महत्या करणा-यांचे प्रमाण जपान मध्ये सर्वात जास्त आहे.
Group Suicides म्हणजे २-३ जणांनी मिळुन, ठरवून केलेली आत्महत्या ! ही लोकं कुठे कुठे महाजालावर संपर्क साधून मग ठरवतात की कुठे , कशी , कधी, कोणाबरोबर आत्महत्या करायची. ह्या असल्या भलत्या गोष्टीसाठी, एकमेका साह्य करणारी माणसे, आत्महत्येचा कुठला पर्याय जास्ती चांगला ह्यावर वेळ घालवण्यापेक्षा जीवनसंघर्षात एकमेकांना मदत का करत नाहीत ?

सरकारदरबारी ह्याची नोंद आणि उपाययोजना वाढत आहेत. Group Suicides साठी उचकावणा-या संकेतस्थळांवर पोलीस गस्त घालत आहेत. NGO’s ही कारणमिमांसा करण्यात आघाडीवर काम करत आहेत. सरकार, कंपन्यांसाठी नवनवे Employee Mental Health साठीचे उपक्रम राबवायला फतवे काढते आहे. जपान मध्ये, खुप सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या यासाठीच, की लोकांनी जरा सक्तीची विश्रांती घ्यावी- कारण काही लोक अक्षरश: अति कामामुळे ही जीव द्यायला राजी होतात.

अनुदिनी अनुतापे तापलो रामराया म्हणत, एकदम हे जग सोडून जाणा-या ह्या लोकांबद्द्ल काय करावे, त्यांना कसा आधार द्यावा आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन, हा सरकारसमोर यक्षप्रश्न आहे.

अधिक माहीतीसाठी वाचा-

http://www.atimes.com/atimes/Japan/FG28Dh01.html
http://www.wsws.org/articles/2004/oct2004/japa-o20.shtml
http://search.japantimes.co.jp/cgi-bin/ed20060619a1.html
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/5082616.stm


संपुर्ण.

Monday, June 05, 2006

मराटी पाउल पडते पुढे

जपानला आल्यावर जे अनेक धक्के बसतात (भुकंपासकट) त्यातिल एक म्हणजे “चालणे” अर्थात “पदयात्रा”. होतं काय, की पुण्यात कायम बुडाखाली दुचाकीवाहनं नाहीतर तिनचाकी रिक्षा- शिवाय आणि दुचाकी वाहन हे हत्यार चालवणे या अर्थि. आणि रिक्षावाल्यांशी हुज्जत घातली नाही- तर पिंडाला कावळा शिवायची मारमार. तर असो.


जपानात आल्यावर एकाएकी आपल्याला पाय हे अवयवद्व्य आहेत आणि ते वाप्रावे लागतात- स्वयंचलित वाहनांशिवाय ही भाजी उचलुन आणता येते हा साक्षात्कार होतो. आणि मग असे अनेक साक्षात्कार क्षणोक्षणी होत राहतात.

आपल्याकडे रस्ता ही दोन खड्ड्यांमधील उरलि सुरली जागा- आणि वाहने चुकवत, पथारीवाल्यांच्या शिव्या खात, बखोटीला कशीबशी मारुन मुट्कुन पकडुन आणलेली, नाहीतर सैरावैरा धावणारी कार्टी घेउन जाणा-या माउल्या.. मध्येच गायी, म्हशी, कुत्र, मांजरी, झालंच तर मेंढरं, किंवा मदार-याचे माकड/ किंवा दरवेशाचे अस्वल- हे सर्व प्राणिमात्र- अशी सर्व स्थिरचर सृष्टी मौजुद असते.

म्हणुनच, इथे आल्यावर “पदपथ” (Footpath) ह्या शब्दाचा अर्थ पुरेपुर कळ्ला ! जपान मधे, कुठे चालवं लागत या प्रश्नाचे उत्तर "सगळीकडे" इतकं साध आहे. म्हणजे ठेस्ना पासुन घराकडे, फलाटावर (काही मोठ्या ठेसनांच्या फलाटांवर तर अक्षरश: १-१ कि.मी. चालायला लागते- इप्सितस्थळी पोचण्यासाठी. त्यातून जर भिडु नविन असला आणि जपानिच्या नावाने बोंब असली, तर मग विचारायलाच नको. तोक्यो स्टेशन वर तर १५ लोकन्ना (इंग्रजीत) पत्ता विचारला की १६ वा मनुष्य पत्ता सांगतो(त्याला इंग्रजी येत असेल तर) नाहीतर बिचारा वाट वाकडी करुन हाताला धरुन रस्ता दाखवायला येतो. सगळ्या, म्हणजे झाडुन सगळ्या Tourist Points वर जबरद्स्त चालायला लागते. मग तुम्ही तुमच्या गाडीने जा नाहितर बस/ट्रेन ने जा- कुठंलही वाहन तुम्हाला फक्त २-३ कि. मि दुर, (त्यांच्या मते) अगदी पाय्थ्याशी नेउन सोडते. मग पुढे तुम्ही आणि तुमचे पाय ! आणि लहान मुलं आणि त्यांच्या बाबागाड्या बरोबर असल्या तर हर हर महादेव !. बर एवढचं नाही, तर प्रत्येक मंदिर/शिंतो Shrine मधे असंख्य पाय-या असतात. मुकाट्याने चढायच्या !

म्हणुन सगळ्या मह्त्वाच्या पर्यट्न स्थळांना भेट दिली तर सर्वात (चालुन चालुन आणि जपानि बोलण्याच्या प्रयत्नाने जेरीला येउन) हैराण झालेले पर्यटक हे एक तर भारतीय नाहीतर सामान्य अमेरिकन असतात. (जाडजुड आणि कायम गाडी ची सवय असलेले)! माझ्या एका जपानी सहकार्याचे असे प्रामाणिक (आणि काहीसे आत्यंतिक) मत आहे, की अमेरिकन लोकं तर कायम गाडि चालवून दमतात आणि श्रमपरिहारासाठी मग McDonald’s वगैरे मधे जाऊन चीज/Beef वगैरे पौष्टिक गोष्टींनी युक्त असा माफक अल्पोपहार करतात. म्हणुनच त्यांचा सरासरी बांधा एवढा मेदयुक्त असतो. म्हणुनच जपान मधे पर्यटकांच्या शारिरिक उद्धारासाटी भरपुर चालायला लावतात. तात्पर्य- चालणे हे येथे, वैकल्पिक नसून अनिवार्य आहे.

पादचारी हा जपान मधे “बिच्चारा” नसून , पादचा-याचा इथे भलताच रुबाब असतो. पादचा-यांसाठीचे signal तोडुन आपले घोडे (खरं म्हणजे गाडी)पुढे दामटवू पाहणारा एकही माई का लाल मला ३ वर्षात दिसला नाहि. जपानी गाड्या गल्लोगल्ली अक्षरश: पादचारी सुखरुप जाइपर्यंत थांबतात. उगीचच “डोळे फुटले का “? “मरायला काय आमचीच गाडी मिळाली का “ वगैरे प्रेमसंवाद येता जाता कानावर पडत नाही, शिवाय आणि हा॔र्न वरचा हात न काढता - त्या मंजुळ आवाजावर आपण आवाज काढुन भांडणार- मायदेशात आणि विशेषत: पुण्यात वाहने फक्त गुरुत्वाकर्षणाचे नियम पाळ्तात(ते सुद्धा नाइलाजास्तवं !)त्यामुळे पुणेरी पादचा-याला, जपानी पादचा-याला मिळ्णा-या ऋजू वागणुकिची सवय होणे अंमळ कठिणचं जाते.

सरतेशेवटी, चालणे ह्याविषयीच्या आपल्या आणि त्यांच्या द्रुष्टीको्णातिल फरक स्पष्ट करायला एक ऊदाहरण वानगीदाखल सांगते-
जपानीच्या तासाला आम्ही सर्वजण”त्सुराइ” म्हणजे- खुप त्रास होणारं/ कट्कटीचं- या अर्थाचा शब्दप्रयोग शिकत होतो. कोणी कोणी काय काय शब्द जुळवून महत्प्रयासानेचं वाक्य तयार केली. तर मी- आमच्या घरासमोर एक ११६ पाय-यांचा जिना आहे- तो रोज चढुन जाणे किती कट्कटीचे आहे- वगैरे वाक्य जुळवली (जपानित)- त्यावर समस्त “गाईजिन” म्हणजे गोरे विदेशी लोकं हळहळले… तु हातात आटवडयाचं जड सामान वगैरे घेउन कशी काय चढतेस बाई ?? ते अपार्ट्मेंट बदल आधी - वगैरे सहानुभुतिदर्शक उद्गार आले.(लक्षात घ्या ते सर्व अमेरिकन, क॔नेडियन वगैरे होते). यावर माझ्या जपानी गुरुमाउलीची प्रतिक्रिया मार्मिक होती. ती म्हणाली “त्सुराइ” काय आहे त्यात ? उलट किती “केंकोतेकी” आहे (म्हणजे तब्येतीला चांगले आहे ! रोज सकाळ- दुपार संध्याकाळ जिना चढतेस/ उतरतेस सामान/ बिमान घेउन म्हण्जे- तब्येत चांगली राहील अगदी- पाठीचे / पायाचे विकार होत नाहीत- etc etc…

हे ऐकुन आम्ही सर्वजण पुरते हबकलो !
तात्पर्य “पाउले चालती तोकियोचि वाट”- चांगली बिकट वाट वहिवाट आहे !!