Weltanschauung

Hi, These are my thoughts on things that matter to me..

Wednesday, November 22, 2006

शरदोत्सव जपान २००६

सेन्दाईत दाखल झालो. वाटेत शरदाच्या लाल पिवळ्या खुणा सगळीकडे भेटत होत्या. पण ऐन बहर ओसरुन आता भकास लाल, केशरी छटा दिसत होत्या. हे म्हणजे चांगल्या नाकी-डोळी निटस असणा-या नववधूचा, हळदकुंकवाच्या मळवटानी अंबाबाई अवतार झालेला असावा तसे. ऐन बहरातले फॉल कलर्स कसे लालचुटुक, किंवा पिवळेजर्द दिसतात ईथे- मग चढत्या भाजणीने भकास दिसायला सुरवात होते.

दाखल झालो तो चांगली कडाडुन थंडी होती. त्या पिसाट थंडीत सामानासकट वणवणत दुस-या दिवशीच्या guided टुरचा थांबा आधी बघावा, मग हॉटेल शोधून त्यात सामान टाकावे आणि मग मार्गस्थ व्हावे असा (आमच्या मते) सरळ साधा सोपा ईरादा होता. पण "अडचणींशिवाय होईल त्याला प्रवास म्हणू नये" हा बहिणाबाईंच्या "कशाले काय म्हणू नये" यातील एक clause राहून गेला असावा… त्याला अजून एक corollary आहे- सुरवातीलाच अडचणी आल्या की नंतरचा प्रवास सुखाचा होतो (किंवा अडचणींची सवय होते)! त्या न्यायाने, वाट चुकलो, थंडीत डोकं बधीर होईस्तोवर वणवणलो, त्या टुर कंपनीच्या हापिसच्या बरोब्बर उलट्या दिशेला जाऊन आलो, तिथल्या जपान्यानी कधी जन्मात आपण असला टुर-बिर ऐकला नाही हा अविर्भाव केल्यावर तत्क्षणी हाय न खाता, जपानी भाषेच्या चिंध्या करत- शेवटी एकदाचे ईष्टस्थळी कडमडलो ! दुस-या दिवशीच्या सहलीत नाव नोन्दवले आणि हॉटेलात सामान टाकून, फिरायला निघालो. वाटेत, रस्त्याच्या मधोमध असणा-या तिन पिवळ्याजर्द झाडांनी शारदोत्सवाची सलामी दिली आणि आतापर्यंतच्या शापाला उ:शाप मिळाला.


सेन्दाईहून ट्रेननी मात्सुशिमाला दाखल झालो. नुसती पायपीट करणे हा उद्देश होता. उद्याच्या टूर मध्ये तसा हाही परिसर दाखवणार होते,पण असल्या सहलीत फराफरा ओढत नेतात म्हणुन आपल्याआपण जरा रमतगमत परिसर फिरावा, फोटो काढावे आणि रात्रीची खास fall colors साठी केलेली रोषणाई पहावी असा कार्यक्रम होता.


आता पावलोपावली दिसणा-या लालपिवळ्या बहराने हृदयाचा ठाव घेतला होता.


मात्सुशिमा हा परिसर म्हणजे जपानमधील सर्वाधिक सुंदर ३ ठिकाणांपैकी. 260 छोट्या छोट्या बेटांचा नयनरम्य परिसर- बे ऐरियाची सहल उद्याच्या टूर मध्ये होती म्हणुन नुसतेच किना-यावर फिरत होतो. जरासे ऊन पडले होते, त्यात थंडी सुसह्य वाटत होती. आसपासच्या शेकड्यांनी असलेल्या पर्यटकात एकही भारतीय उपखंडातला चेहरा दिसत नव्हता. परिसर फारच देखणा. हळूहळू उन खात, फिरत,फोटो काढत चाललो होतो.

दुरवर एक सुंदर लाल रंगाचा पादचारी पूल दिसत होता. तो शोधत शोधत २ कि.मी पुढे चालत गेलो- मग एका माऊलीने सांगितले की तो तर मागेच गेला. पुन्हा मागे येऊन तो पूल शोधला, पैसे भरले आणि फुकुरुजिमा नावाच्या छोट्या बेटावर दाखल झालो. "गर्द सभोवती रान साजणी" होते, "पाय टाकून जळात बसला असला औदंबर" नव्हता तरी दुस्ररीच झाडं पाण्यात पाय टाकून बसली होती. अशा ठिकाणी मनावार दाटते, ती शांततेची साय अनुभवत होतो.

तेवढ्यात समोर एक वृक्षकविता अवतरली.. पिवळ्या, लाल रंगाच्या अद्भूत पिसा-यातल्या काळसर फांद्या तर हातावरच्या नाजूक धमन्यांच्या जाळ्यासारख्या दिसत होत्या. त्या एका झाडात fall colors चे सर्व सौंदर्य एकवटलं होतं. ईथून पुढे बरीच वर्ष ते झाड माझ्या मन:पटलावर राहिल.

पुढे एका वळणावर एक “तानुकी” (raccoon) आला. त्यानी एका जपानी बाईच्या जीन्सची चव चाखून पाहीली.. ती बाई पण धन्य होती.. शांतपणे कुत्र्याशी खेळावं तसे त्याला बाजूला करायला पहात होती. आसपासच्या साताठ लोकांनी लगेच मोबाईलच्या कॅमेरात ते दृष्यब्द्ध केले. ( हे एक जपानी लोकांचे वैशिष्ट्य आहे, यम जरी आला समोर ,तरी त्याला आधी मोबाईलमध्ल्या कॅमे-यात टिपून घेतील (रेड्यासकट)!)
मला तर साध्या कुत्र्याची सुद्धा भिती वाटते, तो तानूकी बघून माझं निसर्गप्रेम एकदम आटलं- आणि पुढे काय झालं ते पहायला न थांबता आम्ही शुरपणे पळ काढला.

परत पादचारी पुलावर येईस्तोवर दुपारच्या पावणेचार वाजता सुर्यास्त झाला.
बे जवळच्या वेटिंग रुम मध्ये पोचलो - आता ५.३० वाजायची वाट पहायची होती. रात्रीच्या रोषणाईसाठी. आतापर्यंत ६ एक तास अव्याहतपणे थंडीत फिरत होतो.जरा टेकलो तसे बरेच अवयव दुखायला लागल्याची जाणीव झाली.त्या अवस्थेत Hot Chocolate पण अमृततुल्य लागलं.

५.३० ला त्या उबदार Waiting Room मधून पाय ओढत, बाहेरच्या ३-५ डिग्री तापामानात. सेदारच्या जंगलात, झुईगांजी मंदिराच्या परिसरात कलात्मरित्या केलेली हिरवी रोषणाई पहात होतो. नवरा ट्रायपॉड लावून फोटो काढत होता. तिथेच तास गेला- आम्हाला येवढ्या थंडीत (तडफडत) फोटो काढताना पहायला एक जपानी आजी-आजोबा आले. आज्जी म्हणाली “तुम्ही एन्त्सुईन ला जा , तिथली रोषणाई इथल्यापेक्षा सुंदर आहे. तिथे काढा फोटो” एवढं म्हणुन आमच्या हातात १००० येन ची तिकीटं कोंबून ते गेले सुद्धा. मी ईतकी गोंधळले होते की तिचे आभार मानावे, पैसे विचारावे वगैरे काही सुचलं नाही. सुचलं तोपर्यंत ते लुप्त झाले होते.
आत एन्त्सुईन मध्ये गर्दीच गर्दी. Fall Colors ला उठाव यावा म्हणून जी रोषणाई केली होती ती केवळ अद्भूत होती. स्वर्ग कदाचीत असाच असावा असे भासवणारी- त्यात त्या डोळ्यातून पाणी काढणा-या बोच-या थंडीचाही सहभाग होता. तिच्या शिवाय, ईतके गूढ धुक्याचे वातावरण तयार झाले नसते. थंडीत फोटो काढून हात गारठले, दात वाजायला लागले, खालच्या जमीनीतली थंडी आता पादत्राण भेदून पायात शिरत होती,पण हौस नावाची गोष्टच अजब असते.

त्या लाल, हिरव्या, पिवळ्या रोषणाईत भूल पडल्यासारखं झालं होतं.त्यातच एक माणूस त्यांनी, संपूर्ण पारंपारिक पोषाखात पावा वाजवायला ठेवला होता. पाईड्पाईपर च्या मागे मुलं जावीत तसे सगळे चालले होते.त्यातच नव-याच्या ट्रायपोडच काहीतरी पडलं, कॅमेरा पडला नाही हे बघून जीवात जीव आला.

शेवटचा टप्पा आला होता, आणि एकदम जे समोर आलं त्यानी विस्फारलेले डोळे पुढची १५ मिनीट तसेच होते. तळ्याकाठ्च्या झाडांवर प्रकाशझोत आणि खाली पडलेलं तळ्यातलं प्रतिबिंब- वर आकाशात एकही चांदणी दिसत नव्हती, दिक्काल धुक्यात हरवलेले काही क्षण ! दिव्यांचा प्रकाश ईतक्या खुबीने टाकला होता की- ३ झाडांची तिन प्रतिबिंब , तळ्यात अप्रतिम दिसत होती. एक हिरव्या पानांचं झाड डावीकडे, मधला विशाल वठलेला,एकही पान नसलेला भुताटकीचा वृक्ष आणि उजवीकडे शारदोत्सवाचे प्रतिक असलेले पिवळ्या लाल पानांचे झाड.. तिथेच तळ्याकाठी पावा वाजवणारा तो पूर्ण पारंपारिक पोषाखातला वादक-.. त्याक्षणी काय वाटले ते शब्दातीत आहे. ते तळ्यातलं प्रतिबिंब पाहून “प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर" असल्याची साक्ष पटत होती. दुर्दैवाने ट्रायपॉडने दगा दिल्याने पुढचे फोटो रात्रीच्या अंधारात येणे अशक्य होते.

५ वेळा तरी आम्ही exit पाशी येऊन, परत एकदा ते पहायला मागे गेलो. बाहेर पडलो ते गोठूनच, आणि ट्रेनची वेळ साधायलाच.. ट्रेनमधल्या उबेत विसावल्यावर Defrost होतोयसं वाटल.

पहिला दिवस सुफळ संपूर्ण.

Sunday, November 12, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद (भाग ४-६)

(4)

एक दिवस एक पोलिस बाबांकडे आला आणि म्हणाला " तुमची चौकशी करायची आहे. ताबडतोब पोलीसचौकीवर हजर व्हा". बाबांना हातकड्या अडकवून, त्यांना तो पोलिसचौकीवर घेऊन गेला. बाबांना गार फरशीवर ओणवं केल्या गेलं आणि सोट्यानी मारहाण केली गेली. ते बेशुद्ध पडले तसे, त्यांच्या तोंडावर बादलीभर पाणि मारून, कातड्याच्या मजबूत बुटांनी पेकाटात लाथ घालून, पुन्हा बेशुद्ध पडेस्तोवर मारल्या गेलं. पण कितीही छळ झाला तरी त्यांचे युद्धविषयक विचार बदलू शकले नाहीत.
गेन आणि उर्वरित कुटूंब घरी हताश होऊन बसले. कोणाची कमाई नाही म्हणून त्यांच्याकडे अन्न विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. शिन्जी रडू लागला-"मला भूक लागली. मी आता उपाशीपोटी मरणार".
"बाबा घरी परत येईपर्यंत धीर धर बाळा" आई म्हणाली.
त्या काळात तांदूळ विकत घेता येणे हे खूप अवघड होते. हि-यांईतकाच महाग आणि दुर्मिळ असायचा तांदूळ तेव्हा!लोकांना भाता ऐवजी धान्याचा कोंडा किंवा भोपळ्याच्या वेली किंवा जे काही खाण्यासारख असेल ते खावं लागायचं. तांदूळ विकणा-यांना नाकाओका कुटुंबासारख्या "गद्दारां"बरोबर व्यवहार करायला मनाई होती. म्हणून आता घरात कुठलंही अन्न शिल्लक नव्हतं
मग गेनच्या सुपीक डोक्यात एक नवी कल्पना आली." आई आपण नाकतोडे पकडून रात्रीच्या जेवणात ते खाऊ."
गेन आणि शिन्जी शस्त्रात्रांच्या टप्प्याकडे धावले, आणि आई आणि ऐको पिशवी घेऊन त्यांच्या मागे धावल्या. काही नाकतोडे पकडुन ते भाजण्यासाठी घरी घेऊन जाताना वाटेतच त्यांना बाबा भेटले. अटकेनंतर २ आठवड्यांनी त्यांची अखेर सुटका केली गेली होती. आनंदानी गेन आणि शिन्जी त्यांना बिलगले.बाबांनी त्यांना घट्ट मिठी मारली आणि ते म्हणाले" सगळं ठीक होईल आता. मी आता तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही"..... जखमांनी आणि व्रणांनी त्यांचे सगळं शरीर भरलं होतं आणि होते त्यापेक्षा खूप बारिक होऊन ते परत आले होते.
भाजलेल्या नाकतोड्यांच्या जेवणानी त्यांनी बाबांचे सुखरुप पुनरागमन साजरं केलं.

(5)
राजाधिराज हा जपानचा ईश्वर आहे आणि सर्व मुलं त्या राजाची मुलं आहेत असे त्या काळी शाळेत शिकवले जायचे. गेनचे शिक्षक म्हणाले" मुलांनो, चांगले मोठे व्हा, राजाधिराजांच्या आज्ञेनुसार कुठेही जाणारी आणि प्रसंगी त्याच्यासाठी स्वप्राणाची आहूती द्यायला तयार असणारी जपानची शक्तिशाली मुलं व्हा"!
एक दिवस गेनच्या वर्गातील मुलांना, दुरदुरच्या समरभुमीत लढत असलेल्या सैनिकांना उद्देशून पत्र लिहायला सांगीतलं गेलं. सैनिकांना पाठवण्याआधी मुलांना आपले पत्र सगळ्या वर्गासमोर जोरात वाचून दाखवायला सांगितले.
एका मुलानी लिहीलं " Dear Soldiers , आशा आहे की तुम्ही बरे आहात. मोठा झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासारखा सैनिक होईन आणि खूप अमेरिकन सैनिकांना मारेन. Please keep up the good work.
दुस-या एका मुलीनी लिहीलं " आम्हीही जपान युद्ध जिंकेपर्यंत कसलेही हाल सहन करु. राजासाठी आणि देशासाठी आम्ही कधीही प्राण द्यायला तयार आहोत."
मास्तरांनी या मुलांच कौतूक केलं आणि त्यांची पाठ थोपटली.
आता गेनला त्याचे पत्र वाचून दाखवण्यास सांगितले गेले. गेन वाचू लागला" Dear Soldiers . माझे बाबा म्हणतात की जपानने ह्या युद्धात भाग घेऊ नये. युद्धात अगणित जीव जातात आणि युद्ध विनाश करते. मलाही तसेच वाटते. Please don't die, soldiers . तुमच्या आईवडिलांना दु:ख होईल."
"मुर्खा हे लिहून तु स्वत:ला खरा जपानी मुलगा म्हणवतोस? पुन्हा लिही ते नीट" मास्तर ओरडले.

गेननी पुन्हा पत्र लिहायला नकार दिला, तेव्हा मास्तरांनी त्याच्या कानफटात मारुन, त्याला दोन्ही हातात बादलीभर पाणी घेऊन बाहेर उभं रहायला सांगीतलं. तास संपल्यानंतर त्याला शिक्षकांच्या खोलीत नेण्यात आलं. आत शिरताच ऐको ला (बहिणीला) अर्ध्या कपड्यात पाहून गेनला धक्काच बसला. गेनला पाहताच ती मुसमुसत सांगू लागली " वर्गातले काही पैसे चोरिला गेले आहेत आणि माझे मास्तर म्हणतात की ते मी घेतले आहेत. मी खरच पैसे घेतले नाहीत, पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही." मास्तरांनी तिचे कपडे काढून, तिची झडती घेतली, पण त्यांना पैसे कुठेच सापडले नाही. त्यांना वाटलं तिने पैसे दुसरीकडे कुठेतरी लपवले, आणि त्यांनी तिला कबूल करेपर्यंत तसच उभं राहण्याची शिक्षा केली.
"माझी बहीण खोटं बोलत नाही तिच्यावर अरेरावी करु नका" गेन म्हणाला. आपली बहिण निष्पाप असल्याचे गेन वारंवार मास्तरांना पटवायचा प्रयत्न करत होता, पण मास्तर विश्वास ठेवायला तयार नव्हते.
जपानच्या दुर्दैवाने, युद्धाच्या काळात शिक्षकांना युध्दकार्याला मदत करणे अनिवार्य होते- त्यांना आवडो किंवा न आवडो.शाळेच्या अधिका-यांची आणि इतर महत्वाच्या व्यक्तिंची त्यांच्यावर सतत देखरेख असायची. विरोध करणा-या विद्यार्थ्यांना शाळेत ठेवायची मनाई होती. खरं बोलतं असले तरी गद्दार आणि त्याच्या मुलांवर विश्वास ठेवला जात नसे.
"खी खी खी"''रयुकीची (अध्यक्षांचा मुलगा) खिडकीतून बाहेर पाहून दात विचकू लागला.
"त्या नाकाओका मुलीला चांगली अद्दल घडली. मीच तिची कागाळी केली होती."
दुस-या दिवशी सकाळी शाळेची वेळ होऊनसुद्धा ऐको ऊठली नाही. आई तिच्या गादीपाशी जाऊन म्हणाली- "ऐको, काय झालय तुला?" ऐको काही उत्तर देईना, नुसतं हमसून हमसून रडत होती. मग गेन म्हणाला" तिला शाळेत जायचे नाही कारण मास्तरांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला आणि तिचे कपडे काढून झडती घेतली."
हे ऐकून बाबांनी कंबर कसली. ते शाळेत गेले आणि शिक्षकांच्या खोलीत शिरले. गेन सांगतोय ते खरं आहे का याची त्यांनी मास्तरांकडे शहानिशा केली आणि त्यांना ऐकोला पैसे चोरताना पाहणा-या मुलाला आणायला सांगीतलं. रयुकिचीला बोलवण्यात आलं आणि लवकरच त्यानी आपण खरतर तिला पाहिलं नसल्याचं कबूल केलं. "मी खोटं बोललो, कारण मला तिला त्रास द्यायचा होता" तो म्हणाला.
हे ऐकून बाबांनी रयुकिची आणि मास्तरांना चांगलच फैलावर घेतलं.

(6)
बाब घरी आले तोच त्यांनी कोज़ी समोर(गेनचा सर्वात मोठाभावासमोर) आईला रडताना पाहिलं. तो खरंतर दूर दारुगोळ्याच्या कारखान्यात असायचा, पण आता तो आपण नौदलात जातोय हे आईवडिलांना सांगायला आला होता. आईनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नव्हता. बाबांनी कोजीला त्याच्या नौदलातून हात-पाय गमावून आलेल्या चुलतभावाचा विचार करायला सांगीतलं.
"कोज़ी, माझ ऐक!" बाबा म्हणाले " युद्धात सहभागी व्हायला शौर्य लागतं हे फक्त मुर्खाला वाटत, पण खरं शौर्य लागतं ते स्वत:च्या आणि दुस-याच्या आयुष्याची पर्वा करायला. ह्या निरर्थक युद्धात मी तुझा बळी जाऊ देणार नाही".
"नाही. मी नौदलात भरती होणारच. मला आता "पळपुटा", "गद्दार" हे ऐकून घेणं सहन होत नाहीये." मग त्यानी आईवडिलांना सांगीतलं की त्याने नौदलात जायचं का ठरवलं. त्याच्या कारखान्यात एक स्फोट झाला होता आणि त्याच्यावर संशयित असल्याचा आरोप करण्यात आला. एका पोलिसाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून कबूलीजवाब मिळवायला त्याला बेदम मारहाण केली.
"तुझा बाप देशद्रोही आहे आणि तुझ्यात तेच गद्दाराचं रक्त आहे. तूच हा दारुगोळ्याचा कारखाना बंद पाडायचा प्रयत्न केलास."- पोलीस कोजीला म्हणाला.

नंतर त्यांना कळलं की short circuit मुळे तो स्फोट झाला होता.पण आपल्या निर्दोष असण्याचा हा पुरावाही, कोजीचा नौदलात जाण्याचा निर्णय बदलू शकला नाही. त्यानी लोकांना आपण देशद्रोही नसल्याचे शाबीत करुन दाखवायचे ठरवलं होतं. युद्धाच्या खाईतून मेडलांनी विभुषित होऊन परत येण्याचा त्याचा मानस होता. मग त्याच्या भावांना गावात ताठ मानेनं चालता आलं असतं.
कोजीचा नौदलात जायचा दिवस आला. आई, ऐको आणि दोन्ही भाऊ त्याला निरोप द्यायला स्टेशनवर गेले, पण शेजारपाजारुन कोणीही गेले नाही. बाबा घरी थांबले होते तरी आपलं काळीज फाटतयसं दु:ख त्यांना झालं होतं.
"हुर्रे! Three cheers for Koji "" त्याचे भाऊ ओरडले. आई आणि ऐको हुंदके देत होत्या.
हळुहळु त्यांचे आवाज मागे ठेऊन गाडी पुढे निघून गेली. आगगाडी स्टेशनपासून जरा दूर गेली, तसे कोजीने बाहेर पाहिले. Track च्या बाजूला बाबांना उभे पाहून कोजीला आश्चर्य वाटलं. आगगाडी पुढे जाऊ लागली तसं बाबांनी हात वर करुन आरोळी ठोकली. " Three Cheers. Hurrah for Koji Nakaoka . जिवंत परत ये बाळा".
"धन्यवाद बाबा"- कोजी म्हणाला.
गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबा पहात राहिले. त्यांचे डोळे पाण्यानी भरले होते.
क्रमश:

Thursday, November 02, 2006

The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद

हादाशी नो गेन- The Story of Barefoot Gen ह्या जपानी anti-war/anti-nuke story चा अनुवाद.

(1)
गेन नाकाओका- आपल्या गोष्टीचा नायक, हिरोशिमात जन्मला आणि वाढला. तो प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्या सुमारास, जपानची ब्रिटन आणि अमेरिकेविरुद्ध लढाई चालू होती.
जपानच्या युद्धातील पराभवाच्या जरा आधीच्या काळात ह्या कहाणीची सुरवात होते.

गेन हा ७ वर्षाचा खट्याळ,आनंदी मुलगा. नवनवीन खोड्या शोधून काढण्यात वाकबगार. त्यासाठी,धाकट्या भावाला-शिन्जीला त्याच्याबद्दल खूप आदर होता. रोज शाळेतून गेन घरी आल्यावर, दोघजणं एकमेकांशी अंधार पडेस्तोवर खेळायचे. त्यांचे वडील लाखेच्या कामातील कुशल कारागीर होते. स्वत:च्या घरातील छोट्याशा workshop मध्ये लाकडावर लाखेची चित्र काढून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत. आई घरकामात, कुटुंबाची काळजी घेण्यात आणि वडिलांना मदत करण्यात व्यग्र असे. मोठा भाऊ -कोजी माध्यमिक शाळेत शिकत असे. शाळेत जाण्याऐवजी तो आणि त्याचे मित्र आताशा, घरापसून लांबच्या, हिरोशिमाच्या जवळच्या दुस-या गावात, एका दारुगोळा बनवायच्या फॅक्ट्रीत काम करत असत. सरकारी धोरणानुसार, जपानला युद्ध जिंकायला मदत म्हणुन, विद्यार्थ्यांना अशा कारखान्यात काम करावं लागत असे- त्यांची ईच्छा असो वा नसो! शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांसोबत अकिराला (२ नंबरच्या भावाला), जिथे बॉम्बहल्ल्याची कमी शक्यता होती अशा दूरच्या गावात जाऊन रहावं लागलं. निघताना, भरलेल्या डोळ्यांनी, अकिरा आईला "मला जायचे नाही" म्हणत होता.तिस-या ईयत्तेतल्या मुलांपासून evacuation ची सुरवात झाली होती आणि अकिरा तिस-या ईयत्तेत होता. एकुलती एक बहिण 'ऐको', ५व्या ईयत्तेत असली, तरी तब्येतीने अशक्त असल्यामुळे घरी आईवडिलांकडे थांबू शकली होती. गेनचं कुटुंब ह्या सात जणांच होतं. युद्धाच्या सगळ्या समस्यांना, होता होईल तो एकमेकांना सांभाळुन हे कुंटुंब तोंड देत होतं- पण युद्ध संपेपर्यंत कुटुंबातले सगळेच काही जिवंत राहिले नाहीत...

एक दिवस, आईने गेनला तिच्या पोटाला कान लावून ऐकायला सांगितलं. आईच्या पोटात काहीतरी जोरदार हालचाल होत होती. "आपल्या घरी लवकरच नवीन बाळ येणार आहे आता "- आई हसत हसत म्हणाली.
“माझं छोटा भाऊ किंवा छोटी बहीण- “ गेन किंचाळत म्हणाला.
"आणि बाळ लाथ मारतय.."
दोन मोठ्या मुलांच्या वियोगामुळे तसं सगळं घर उदास असायच. पण आता गेनच्या आनंदातिशयानी आख्ख्या घरात धीर आणला, आशा आणली.

गेन आणि शिन साठी अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे- कुटुंबाच्या गव्हाच्या शेतात जाऊन बाबांना मदत करणे.गव्हाच्या कापणीची ते दोघं अगदी आतुरतेने वाट बघायचे कारण त्यांना खात्री होती की आपण ह्यापासून नुडल्स किंवा ब्रेड बनवू शकू. त्यांची एकच ईच्छा होती , एका दिवसासाठी का होईना, पण पोट तुडुंब भरलेलं असावं! रोजच्या जेवणात, अक्षरश: भाताची शित मोजता येतील एवढी पाणीदार कांजी असायची. त्या काळ्या दिवसात जपानातील ईतर लोकांप्रमाणेच, ते नेहमीच भुकेले असायचे.

(2)
बाबा कधी कधी निराश व्हायचे, कारण त्यांना कळत होतं की जपान एक दुस्तर युद्ध लढत आहे. सुदूर दक्षिणेकडिल बेटांवर तैनात केले गेलेले शिपाई तण, उंदीर, साप आणि जे मिळेल ते खात होते. तरिही उपासमारीने मरत होते. काही आजारी पडले, तर काहींच्या बॉम्बहल्ल्यात ठिक-या ऊडाल्या. आपल्या कुटुंबाला सुखसमाधानात रहायला मिळावं म्हणुन बाबा आतुरतेने युद्ध संपायची वाट बघत होते. त्यांच्या तीव्र ईच्छेला न जुमानता, युद्धाची धुमश्चक्रि दिवसेंदिवस वाढतच होती.

१९४५ मधील एप्रिलच्या पहिल्या दिवशी, अमेरिकेची फौज ओकिनावात(जपानच्या सर्वात दूरच्या तटबंदीवर) डेरेदखल झाली. घनघोर लढाईने ओकिनावाच्या रहिवास्यांना घेरलं आणि जवजवळ विध्वंसाच्या टोकांपर्यंत नेउन ठेवलं.ओकिनावाची हिरवीगार धरती आणि निळ्याशार समुद्र ,रक्ताच्या लाल रंगाने माखले. दुष्मनांचे हवाई दलं जवळजवळ रोज mainland जपानकडे जाऊ लागले. शहरांवर बॉम्ब टाकून, आगीचे डोंब उसळ्वू लागले आणि रातोरात शहरं बेचिराख करु लागले. आगीच्या लोळात अगणित लोकं जळुन मेले. रेडिओ आणि वर्तमानपत्र मात्र, जपान सगळ्या लढाया जिंकत असल्याचे खोटे वृत्तांत देत हो्ते. ज्या नेत्यांनी युद्धात लढ्ण्याचा निर्णय घेतला होता ते ठासून सांगत होते " जपान हा पवित्र देश आहे. आपण युद्ध जिंकणारच ". नेतेमंडळी धादांत खोटं बोलत होती आणि युद्ध थांबवायला नकार देत होती. वृत्तांत ऐकणा-यांचा मात्र, शेवटी जपान युद्ध जिंकणारच, असा समज होत होता. लोकं रोज तकलादू बांबूच्या काठ्याकामट्यांनी शत्रूला कसं मारायच- हे शिकायसाठी कवायती करत होते. शेवट्च्या माणसापर्यंत लढण्याचे संकल्प सोडत होते.
एक दिवस, बाबा जरा जास्तच साके पिऊन या भाला कवायतीत गेले. त्याचा, त्या कवायतीच्या प्रमुखाला खूप राग आला. तो स्थानिक समितीचा अध्यक्ष होता. " तुम्हाला आपल्या अतिमहत्वाच्या युद्धाबाबत गांभिर्य नाही. दारु पिऊन कवायतीला यायची तुमची हिम्मतच कशी झाली ? अशा पवित्राने तुम्ही अमेरीकेच्या शिपायांचा पराभव कसा करणार? तुमच्यात योग्य ती भावना नाही. "
"अध्यक्षसाहेब, अशा माणसाला काढूनच टाकलं पाहिजे.. असा माणुस म्हणजे गद्दारासारखाच- "असे भाला हाताळायला शिकवणारा एक निवृत्त म्हातारा शिपाईगडि म्हणाला. "अगदी बरोबर"- अध्यक्षाने मान डोलवली..

आता बाबांनाही राग आला.. ते म्हणाले "गप्प बसा. मी निव्व्ळ दारु पिऊन आलो म्हणुन मी गद्दार ठरत नाही. शिवाय ह्या बांबूच्या भाल्यांनी अमेरिकनांचा पराभव करायची आशा बाळगणे हे मुर्खपणाचे आहे. सुरवातीपासून अंतापर्यंत हे युद्ध ही एक चुक आहे."
मग बाबांनी भाला फेकून दिला आणि ते घरी गेले. अध्यक्ष आणि त्याचे गडि, सगळे त्यांच्यामागून "गद्दार, गद्दार "च्या आरोळ्या देत होते. युद्धाला विरोध करणा-यांना सरसकट गद्दार म्हणलं जायच. त्यांची अट्टल गुन्हेगारांहून जरा कमी अवहेलना केली जायची.

(3)
गेन्- ऐक मी काय सांगतोय ते"- बाबा म्हणाले. "यूद्धानी माणसं, प्राणी, झाडं आणि घरं सगळच उद्ध्वस्त होतं. दु:ख आणि यातना या शिवाय युद्ध आपल्यासाठी काहीही मागे ठेवत नाही.जपाननी युद्ध थांबवून शांतीचा मार्ग अनुसरला पाहिजे."

ते काय म्हणत होते ते गेनला समजणे अवघड होतं. तरीपण बाबांच बरोबर आहे याची गेनला खात्री होती.
पण शेजारपाजारचे मात्र रस्त्यावरुन जाता येता गेन आणि त्याच्या भावाकडे तुछ्चतेने बघत आपल्या मुलांना कुजबुजत सांगत:" त्यांचे वडिल गद्दार आहेत. मुलं ही बापाच्याच वळणावर जाणार. त्यांच्यापासून दूर रहा."

एक दिवस गेन, ऐको आणि शिनजी वडिलांनी लाखेच्या गिलावा दिलेल्या लाकडी वस्तू ठेल्यावर टाकून, ठेला खेचत घाऊकविक्रेत्याकडे नेत होते. मिळालेल्या पैशातून, काळ्याबाजारातून तांदूळ विकत घ्यायचा होता. नदीकाठच्या रस्त्याला लागले, तसे त्यांच्यावर दगडफेक होऊ लागली. दगडफेक करणारी मुलं म्हणजे अध्यक्षांचे चिरंजीव ( ryukichI )र्युकिची आणि त्याचे टारगट मित्र. त्यांनी ह्या तिन मुलांचा रस्ता अडवला आणि म्हणाले "गद्दार कुठले! तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही आता". मग त्यांनी ठेला हिसकावून घेतला आणि नदीत ढकलून दिला. तो माल नदीत भिजला आणि वाया गेला.

गेनच्या तळपायाची आग मस्तकात गेली . "बाबा गद्दार नाही. तू खोटारडा आहेस" क्षणार्धात, तो र्युकिचीच्या अंगावर धाऊन गेला आणि त्याच्या बोटाला कडकडुन चावला- डोक्यात धोंडा बसूनही तो बोट सोडेचना.
र्युकिचीने भोकाड पसरलं आणि रक्त ठिबकणारे आपले बोट घेऊन तो पळून गेला. गेन ती मारामारी जिंकला खरा, पण त्याला त्या यशाचा आनंद घेता आला नाही. ऐको आणि शिन्जी अपमानाचे अश्रू ढाळत होते.
अचानक, गेनला बाबांचा नेहमीचा उपदेश आठवला- "ग़ेन- धिर धर बाळा. तू गव्हाच्या ओंब्यांसारखं सशक्त असलं पाहीजेस. गहू किती वेळा पायदळी तुडवला जातो म्हणून पुन्हा पुन्हा ऊठुन उभा राहू शकतो."

मुलांनी, भिजून तरंगत असलेला सगळा माल नदीतून गोळा केला आणि घरी घेऊन आले. पण आईबाबांना त्यांनी घडलेली घटना पूर्ण सांगीतली नाही. फक्त माल नदीत पडल्याचं सांगीतलं.

क्रमश: